Showing posts with label Prabhakar Panshikar. Show all posts
Showing posts with label Prabhakar Panshikar. Show all posts

Monday, March 28, 2011

कर्तबगारांची नगरी भाग - १ , आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

पणशीकर दौ-यावर गेले की, नाटकाचा वेळ सोडून ते तिथल्या बाजारात फिरायचे. अर्थातच ते त्यांना स्वत:साठी काही आणायला जायचे नाहीत. आपल्या नाटकासाठी, आगामी नाटकाच्या निर्मितीसाठी काही वैशिष्टयपूर्ण गोष्टी मिळताहेत का याचा ते शोध घेत. निरनिराळ्या गोष्टींचा वेध घेण्याची त्यांची सवयच होती. ‘तो मी नव्हेच’ साठी आचार्य अत्रे यांच्याबरोबर ते खरेदी करायला गेले होते. त्यावेळी अत्रेसाहेबांचा खर्च करतानाचा हात किती सढळ होता आणि त्या मागचा त्यांचा विचारही किती वेगळा होता हे ते पणशीकर नेहमी सांगत. दिवाकर दातार रूबाबदार दिसावा यासाठी सुटासाठी अत्रेसाहेबांनी महागातलं उंची कापड खरेदी केलं. एवढंच नाही तर दोन इंपोर्टेड रूमाल घेतले आणि पेन्स घेतली. पंतांनी साहेबांना विचारलं "साहेब इतके किंमती रूमाल आणि पेन्स घेऊ नका. ते नेहमी चोरीला जातात". साहेबांनी विचारलं "मग तुम्ही काय करता?" "आम्ही रूमाल अर्धे कापून वरच्या खिशात ठेवतो आणि पेनचं फक्त टोपणंच खिशाला लावतो, म्हणजे त्या वस्तू कोणी पळवून नेत नाही" पंतांचे हे व्यवहारचतुर उत्तर ऐकून साहेब आपली प्रशंसा करतील असं त्यांना वाटलं होतं पण साहेब म्हणाले, "पणशीकर ही पेन्स आणि रूमाल चोरीला जातात म्हणून घ्यायचीच नाहीत असं करू नये. हे प्रेक्षकांसाठी आहे. प्रेक्षक आपला वेळ आणि पैसा खर्च करून नाटकाला येतात.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

Monday, March 21, 2011

फूले अश्रूंची अन् आठवणींची, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

१४ मार्च प्रभाकर पणशीकरांचा वाढदिवस. त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा कसा साजरा करायचा याची आखणी कुटुंबीयांच्या, त्यांच्या मित्रांच्या, जवळच्या संबंधितांच्या मनात सतत चालू होती. कल्पना मांडल्या जात होत्या. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी समिती आकाराला येऊ घातली होती. पण या सर्व मांडणीपासून स्वत: पणशीकर अलिप्त होते. त्यांना त्यात बिलकुल भाग घ्यावासा वाटत नव्हता. ते या समारंभासाठी तयार नव्हते. शरीर साथ देत नव्हतं. तब्बेतीच्या तक्रारी चालूच होत्या. मनही या सोहळयासाठी राजी नव्हतं. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना आग्रह करून पाठपुरावा केला असता आणि ‘हा समारंभ करणे ही तुमच्यापेक्षा आमची भावनिक गरज आहे. आमच्यासाठी आम्हाला हा सोहळा पार पाडू द्या’ अशी गळ घातली असती तर त्यांचा होकारही मिळविता आला असता आणखी एक संस्मरणीय समारंभ झाला असता. पणशीकरांची इच्छा नव्हती ते नसताना त्यांची स्मृती जागवीत चौदा मार्चचा दिवस पार पडला. ‘नाटक चालू असताना रंगमंचावर काम करताना मरण यावं.’ असं अवघं आयुष्य रंगभूमीसाठी वेचलेल्या कुठल्याही कलावंताला वाटेल पण त्यासाठी शंकर घाणेकरांसारखं रंगभूमीवरचं मरण चटका लावून जातं.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

Monday, March 14, 2011

दामुच्या गोव्याक् वयता भाग-४, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

रसिकहो, हा भाग ‘दामुच्या गोंव्याचो’ शेवटला भाग. या नंतर येणार ‘दादर’. पण हे पश्चिमेकडे दादर विजयनगरच्या पुलाकडून किंवा टिळक ब्रिज क्रॉस करून दादर टी.टी.च्या सर्कलवरून जे श्रीमंतांचं, पारशांचं आणि आपलं वेगळेपण जपणारं ‘दादर पूर्व’ पंतांच्या मनातच राहून गेलं. पंतांचं प्रदीर्घ वास्तव्य दादरला. कॅडल रोडच्या इंगळे हॉस्पिटलच्या जवळच्या धुरूवाडीत. सिध्दीविनायकाचा हा परिसर. पण आपल्या कामालाच पूजा मानणारे पणशीकर इतक्या वर्षात मोजून तीन-चार वेळा सिध्दीविनायकाच्या मंदिरात गेले असतील. ते तिस-या मजल्यावर राहतात. अलिकडे अतिशय शांतपणे ते तो गड चढून जायचे. त्या घरातही डायनिंग टेबलवरती आणि त्याला लागून असलेल्या बेडरूममध्ये आम्ही खूप वेळा लिहायची बैठक मारून लेखन केलेलं आहे. बाहेर विजयावाहिनी टि.व्ही लावून सिरीयल बघत बसलेल्या चार दिवस सासूचे सकट त्यांना मालिकांचं प्रेम आणि पणशीकरांना ‘न्यूज’ एवढी एकच मालिका आवडायची. बाकी त्यांनी टि.व्ही. फार कमी बघितला.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


Monday, March 7, 2011

दामुच्या गोंव्याक् वयता भाग-३, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी,प्रभाकर पणशीकर यांचा लेख

पं. भीमसेन जोशी पुणे विद्यापीठात ‘मारवा’ गात असतानाच पुण्यात अवघ्या गानवेडया-नाटयवेडया रसिकांना खॉंसाहेब वसंतखाँ देशपांडे यांच्या दु:खद निधनाची बातमी समजली. त्यानंतर जी शोकसभा झाली त्यात पु.ल. देशपांडे जे म्हणाले त्याची आज आठवण होते. वसंतरावांच्या नसण्याचा उल्लेख करून पु.ल. म्हणाले की, ‘वसंता नाही अशा जगात आपल्याला जगायला लागेल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती.’ याच शब्दात फक्त थोडा नावाचा बदल करून पंतांशिवाय आपल्याला त्यांच्या शब्दांचं बोट धरून चालावं लागेल आणि ते नसताना त्यांचे लेख संपादित करून त्याचे भाग करून पाठवावे लागतील अशी कल्पनाही केलेली नव्हती. काळाच्या-नियतीच्या पावलांचा आवाज आपण ऐकू शकत नाही. नियती आपलं काम करून पुढे निघून गेली की, घडलेल्या घटीताच आपण फक्त साक्षीदार असतो. मग तो काळ ती अप्रिय, दु:खद घटना आपल्यापासून दूर दूर नेतो. आपल्याला त्या नसण्याची सवय करून देतो. आपला प्रवास पुढे चालत राहतो. पंतांना जाऊन महिना-सव्वा महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलाय. कामं चालू आहेत, चालू रहाणार आहेत. मुख्य खंदा फलंदाज बाद झाल्यावर एखाद्या नाइट वॉचमनवर फलंदाजी करून खेळपट्टीवर टिकून आहे. टिकणार आहे!


लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

Monday, February 21, 2011

दामूच्या गोव्याक् वयता... भाग २, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

संपादन : आप्पा कुलकर्णी


पणशीकर गोष्टीवेल्हाळ. त्यांना गप्पा मारणं, गप्पांची मैफिल जमवणं आणि त्यात त्यांच्या अनुभवाचे रंग भरणं याचा विलक्षण आनंद. कितीतरी गोष्टींची नवी आवृत्ती ऐकायला मिळायची. पण एखादा गायक त्याच्या साधनेतून, चिंतनातून एकाच रागाची अनुपम अशी विविध रूपं आपल्या अनेक मैफलीतून ऐकवत असतो आणि रसिकांना प्रत्येकवेळी नवा आनंद देत असतो तसाच आनंद पणशीकर अनेक गप्पांमधून देत राहिले. कोणी त्यांची मुलाखत घ्यायला आला तर तयारी, थोडे प्रश्न मग ते कशा पध्दतीनं घेऊ हा प्रकारच नव्हता. मुलाखत घेणारा तयारीनिशी यायचा, त्याला काहीही विचारायची मुभा असायची. पंत फक्त त्याला थोडा मोकळा करायचे, रिलॅक्स करायचे, त्याला सांगायचे ‘फक्त एक लक्षात ठेवा मी थोडा विस्तारानं म्हणजे पाल्हाळ लावून काही सांगायला लागलो ना, तर मला मधेच अडवायचं, नाहीतर मी थांबणार नाही..’ अर्थात त्यांना थांबवण्याऐवजी त्यांचं बोलणं ऐकत रहावसं वाटे! आपलं म्हणणं मांडताना, लिहिताना विषयांतर व्हायचं. पणशीकर दुस-या विषयात मुक्त विहार करायचे पण मूळ विषयाकडे दुर्लक्ष करून भरकटतच कधीच जायचे नाहीत. तो मूळ विषय त्यांच्या डोक्यात पक्का असायचा. ते लिहिताना सांगायचे ‘आप्पा या छोटया छोटया गोष्टींच्या निमित्तानं हे असं आठवतं. काही गेलेल्या लोकांची आठवण निघते, त्यांचीही नावं घेणं, त्यांचेही स्मरण करणं महत्त्वाचं वाटतं, म्हणून हे मी या थोडं विषयांतर केलं.’ त्यामुळेच त्यांचं सागणं प्लॅन्ड नव्हतं. ते विषय ठरवत त्यावर आमचं बोलणं होत असे. बोलताना वेगळाच विषय सूचायचा त्यावर लिहिणं व्हायचं. ‘आप्पा, कुठंतरी ‘पंच्याहत्तरी नंतर’ असम लिहून ठेवा. त्यावर काही लिहूया.’ त्यांना नवनवीन विषय सूचायचे. सारी माडणी डोक्यातच असायची, ती घटलेली, घोकलेली नसायची. विषय कोणता, त्याला अनुसरून त्याची कशी मांडणी करायची, शैली-शब्द सारं यायचं, आतून यायचं मनापासून यायचं. माझी तर खात्री होती की, बावन्ना भागांनंतरही ‘आठवणीतले मोती’ असेच पुढे चालू राहिले असते तरी शिंपीत जसा पाण्याचा टपोरा थेंब पडून नव्या झळाळीचा नवा मोती तयार होतो तशा त्यांच्या आठवणीच्या शिंपीत त्यांच्या तल्लख स्मरणाचा थेंबुटा नव्या झळाळीची मौतिक घेऊन तुमच्या भेटीला आला असता, पण पंतच वेगळ्या प्रवासाला, अद्याताला भेटायला निघून गेले. त्यांच्या शब्दातून काही काळ का होईना ते भेटणार आहेत हेच समाधान!
 
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


Monday, February 14, 2011

दामूच्या गोंव्याक् वयता..., आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

प्रस्तावना : आप्पा कुलकर्णी


पंतांच्याच शब्दात बोलायचं तर असलेल्यांच्या यादीमधून ते नसलेल्यांच्या यादीत जाऊन बसले. पण त्यांच्या नसलेल्यापणाची सवय मात्र मला व्हायची आहे. माझ्यासारखाच ब-याच जणांचा हाच अनुभव असेल. काहीवेळा रोज जी माणसं आपल्याला भेटत नाहीत, त्यांच्याबाबतीत आपली अन्य व्यवधानं चालू असल्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या कोणत्याही विचारांचा प्रश्न येत नाही ते आहेत, इतरत्र कुठेतरी वावरत आहे त्या विचारानं मन शांत असतं. पंत तर सतत विहार करणारे, त्यामुळे ते बाहेर कार्यक्रमानिमित्त गेलेले आहेत. पुढच्या आठवडयात भेटतीलच, अशा कल्पनेनं कामं पार पडत असतात. काहीतरी आठवतं आणि वास्तवाची जाणीव होते. पंत परतणार नाहीयेत. त्यांचा आवाज प्रत्यक्ष आमोरा-समोर बसून ऐकता येणार नाहीये. सवय व्हायचीय त्यांच्या नसण्याची, सवय व्हायचीय. हिरमुसल्या मनानं कामं करतोय खरे काहीतरी तुटलेपण सलतंच आहे. सलत राहाणारच आहे.

पणशीकरांचा श्वास नाटक. नाटक म्हटलं कि दौरे आले. पंत किती किलोमीटर्स आणि कुठं कुठं फिरले हे सांगता येणं मुश्कील आहे. पण जिथं रस्ता तिथं महामंडळाची एश्टी तिथं तिथं पंतांची नाटकं सादर केली गेली. पंडित भिमसेन जोशी याच भटक्या जमातीतले. त्यांना स्वत:कार चालवण्याची खूप आवड. कितीही दूरचा प्रवास असला, तरी ते तो पल्ला पार करून मैफल रंगवायचे. पणशीकरांनी कधीही गाडी चालवली नाही पण दिवसा आणि रात्रीही ते ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर जागे राहिले-जागते राहिले. गाडीतले अवघे झोपलेले असले तरी ते जागे राहिले. भारतभर त्यांचे दौरे व्हायचेच पण महाराष्ट्र तर त्यांनी उभा अडवा पिंजून काढला होता. त्यामुळेच रात्री कितीही वाजता कुठंही थांबलं तरी गाडीतून बाहेर डोकावून सांगायचे इथं पुढच्या चौकातून गाडी उजव्या हाताला घे तिथलं हॉटेल रात्रभर उघडं असतं.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर



Monday, February 7, 2011

माझे भाग्यविधाते, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

प्रस्तावना : आप्पा कुलकर्णी

‘आठवणीतले मोती’ सदर एकोणचाळीस भाग होईपर्यंत प्रभाकर पणशीकर आपल्याशी संवाद साधत होते. आपल्या मायबाप रसिकांच्या प्रतिसादानं उत्साहानं एकेक मोती आपल्यापुढे ठेवत होते. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांनी यापूर्वी काही लेखन केले होते. त्याचे समोर बसून मी ते लिहून घेतले होते. ते त्यांचे लेखन-तो त्यांचा संवाद आपल्यापुढे ठेवताना मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे हा त्यांचा आठवणीतील मोत्यांचा एकेक मोती आपणापर्यंत पोहोचवता येत आहे, याचे समाधान आणि पंत आपल्यासोबत नाहीत ही कटू, मन विषण्ण करणारी वस्तूस्थिती अधिकच दु:ख देणारी आहे. पंत ‘शो मस्ट गो ऑन’ हे मानणारे होते. माणूस गेला-नट गेला तरी त्या भूमिकेचा मुखवटा दुसरा कोणी चढवतो. परत रंगदेवतेची पूजा होते, परत धूपाचा दरवळ पसरतो, परत खणाणणारी घंटा रंगमंच व्यापते आणि नव्या नटाच्या मदतीने नाटकाचा प्रयोग सुरू होतो, तो प्रयोग असतो. प्रयोगात पूर्वीसारखेच यश मिळेल की नाही, माहित नसते. लोकांना या आधी काम केलेल्या नटाची आठवण येईल की त्याच्या बदली नव्याने आलेला ती आठवण पुसेल? काहीच सांगता येत नाही. सारं मायबाप आणि तो नटेश्वर यांच्या भरवशावर चाललेलं असतं. पण तो शो पुढे चालत राहणं ‘मस्ट’ असतं. तोच ‘मस्ट’चा धागा धरून हा खेळ पुढे चालणार आहे.

मो.ग. रांगणेकर- पणशीकर ज्यांना ‘माझे भाग्यविधाते’ म्हणत त्या त्या रांगणेकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेला त्यांच्या आठवणीतला एक मोती रसिक वाचकांसमोर ठेवत आहोत. पणशीकर आणि रांगणेकर यांच्यातले भावबंध, त्यांना रागणेकरांनी दिलेलं ममत्व, स्नेह आपुलकी यातून जाणवते, त्यांच्यावर टाकेलला विश्वास जाणवतो. रांगणेकरांनी पणशीकरांवर प्रसंगी कोर्टात केसही केली. पंतांचा उमद्या स्वभावानुसार ‘आले देवाजीच्या मना...’ असं ते तो कटू इतिहास सांगायचा टाळतात. त्यांच्या लेखी भांडणे, मतभेद त्यातून आलेला दुरावा या पेक्षा रांगणेकरांनी किती शिकवलं, भरभरून दिलं आणि आपलं जीवन किती समृध्द केलं, हेच पणशीकर जपतात.

पणशीकरांचा हा लेख त्यांच्याच भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवताना आपल्याला रांगणेकरांचे दर्शन होईलच, पण त्याहीपेक्षा पणशीकर नटवर्य प्रभाकर पणशीकर माणूस म्हणून खरंच किती मोठे होते, याचं दर्शन होईल हे नि:संशय! 


लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

Monday, January 31, 2011

-आणि पंतांचा लिहिता हात थांबला!, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

‘तोच मी’ या पुस्तकाची शेवटची पानं सुरू झाली. ‘नांदी’नं सुरू झालेलें पुस्तक ‘भरतवाक्य’ या प्रकरणानं संपणार होतं. हे संपणं जाणवणार होतं. एक निर्मिती आकार घेत होती. त्याची प्रकिया संपणार होती. उद्या सकाळी अकरा-साडे अकराला जायचं नाहीये या नं जाण्याची सवय करायला हवी. पण आज तर लिहायचं या विचारानं पंतांकडे पोहोचलो. नेहमीच्या जागेवर बसलो. पंतांची खासियत अशी की आदल्या दिवशीचे वाक्यही ते विचारायचे नाहीत, मी स्थिरस्थावर झालोय हे पाहून ते सुरू करायचे. ‘हां’ असं म्हणून त्यांनी सुरूवात केली. ‘प्रत्येकाच्या मनात एक असलेल्यांची यादी असते आणि दुसरी नसलेल्यांची. असलेल्या यादीपैकी बरीच मंडळी आपल्या डोळ्यादेखत नसलेल्यांच्या यादीत अलगद जाऊन बसतात. हळूहळू नसलेल्यांची यादी वाढू लागते आणि मग लक्षात येतं की आपणही त्या नसलेल्यांच्या यादीत जाऊन बसणार आहोत, अन् त्याचबरोबर आपलं असलेलंपणही संपून जाणार आहे. पण या संपून जाण्याची मला कधीच चिंता वाटली नाही. या संध्याछायांनी मला कधीच भिवविलं नाही. माझं आयुष्य मी जगलोय. कृतार्थपणे जगलोय.’ पंतांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. सुरूवात समाधानाची, त्यांची नजर मला परिचयाची झाली होती. त्यांचा ओध सुरू झाला. अधूनमधून आम्ही थोडी चर्चा करीत होतो. एखादा शब्द बदलत होतो. पण एक मुरब्बी प्रतिभावार लेखक त्याच्या स्वतंत्र शैलीत सांगत होता. मी लिहित होतो. कारण मला नाटकाच्या निर्मितीविषयीचा भाग नाटकाचं कथानक, नाटककाराशी चर्चा, नट नटयांचा शोध, त्याचे प्रयोग अशा घटनांच्या वर्णनातच सांगितला जायचा. निर्माता या नात्यानं ते त्यात रंगूनही जायचे. पण ‘भरतवाक्य’ या प्रकरणात त्यांच्यातला चिंतनशील लेखकच समोर आला. त्यातून अनेक सूरबध्द वाक्य आकाराला आली. नाटकाची रंगभूषा उरविल्यानंतर मी एक सामान्य माणूसच हे त्यांचं सांगणं होतं. ‘सामान्य माणसासारखं सामान्यात मिसळून जात असतानाच, माणूस न्याहाळण्याचं, माणूस वाचण्याचं माझं आवडतं कामंही मी करीत असतो.’ असं म्हणताना ‘पणशीकर’ असं म्हणून रस्त्यातला माणूस शेजारच्याला दाखवत असेल तर त्यांना त्यांचं सामान्यपण हिरावून घेतल्यासारखं वाटायचं, इतकं या असामान्य कर्तुत्वाच्या नटाची नाळ सामान्य माणसाशी जोडलेली होती. हे सारं भरतवाक्य एकीकडे एखाद्या सुरेख स्वमतासारखं आहे.


लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

Monday, January 24, 2011

नटवर्य प्रभाकर पणशीकरांचा चाफावरील लेख : नाटकासाठी दशदिशा

काही वर्षांपूर्वी फलटण शुगर फॅक्टरी येथे नाटकाच्या प्रयोगानिमित्त गेलो होतो. स्थानिक मंडळींबरोबर झालेल्या गप्पा-टप्पांत बालगंधर्वाच्या नाटक मंडळींचे पडदे तेथील एका मंदिरात सुव्यवस्थितपणे रूळांवर टांगून ठेवल्याचं कळलं. मोठया कुतुहलानं मी हे पहायला गेलो. तेथील व्यवस्थापकानं मोठया अगत्यानं ते पडदे उलगडून दाखविले. पन्नास-साठ वर्षांपूर्वी चितारलेले ते पडदे, पण त्याचे रंग अजूनही ताजे टवटवीत भासत होते. मी मोठया श्रध्देनं ती अजोड कलाकारी पहात असताना माझे डोळे मात्र अश्रूंनी डबडबले होते. त्या पडद्यांचा नाटयगृहापासून त्या मंदिरापर्यंतचा झालेला प्रवास मोठा क्लेशदायक होता. गंधर्वमंडळींच्या विपन्नावस्थेत ते पडदे एका गुजराथी किराणा व्यापा-याकडे गहाण पडले होते. पुढे कंपन्या बंद पडल्या. त्या व्यापा-याने दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता मावळली. पण त्या भल्या गृहस्थानं पडद्याला नुकसान पोहोचवणार नाही अशी खबरदारी घेतली होती. कालांतराने त्याच परिसरात उभ्या राहिलेल्या फलटण शुगर फॅक्टरीने संचालक श्रीमान दादासाहेब आपटे यांना ही हकीकत समजली. ते ताबडतोब त्या किराणा व्यापा-याला भेटले. त्या पडद्यांपोटी झालेला व्यवहार समजावून घेतला आणि त्या गुजराथी व्यापा-याकडून ते पडदे ताब्यात घेतले. आवश्यक ती डागडुजी करून ते पडदे त्या देवळात टांगून ठेवले. नाटकाच्या त्या पडद्यांचा आता तसा व्यावहारीक उपयोग काहीच नव्हता पण एका नटसम्राटानं वापरलेले पडदे जतन करावे या श्रध्दा भावनेनं हे सर्व घडलं होतं. हे सारं ऐकताना माझ्यासमोर १९३० पासूनचा मोठमोठया नाटक कंपन्या कोसळण्याचा काळ उभा राहिला. गंधर्व मंडळींची वाताहात झाली. ‘ललितकला’ ग्वाल्हेर मुक्कामी बंद पडली. तेथेच त्या कंपनीचे मालक बापूराव पेंढारकर यांचं निधन झालं. ग्वाल्हेर नरेशांनी आणि रसिकांनी कंपनीच्या शिक्षापाण्याची तरतूद केली. सर्वांना परतीच्या प्रवासाचे पैसे दिले. दिनानाथारावांच्या बलवंतची स्थिती काही याहून वेगळी नव्हती. फरक असलाच तर फक्त तपशीलात.

पुढील भाग वाचण्यासाठी भेट द्या. चाफा सदर

Monday, May 24, 2010

अजि म्या तुरुंग पाहिला...

कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण माझ्या आयुष्याची उणी-पुरी चाळीस-पन्नास वर्षे कोर्ट-कचे-या लॉकअप, सक्तमजुरी भोगण्यात गेली, गंमत म्हणजे याच काळात मी न्यायदानही केलं आणि गुन्हेगारांना कडकपणे शिक्षा भोगायला लावल्या. असा मी कोर्टापासून तुरूंगापर्यंत आणि तुरुंगापासून गुन्हेगारांपर्यंत आयुष्यभर खो-खो खेळत राहिलो. पण प्रत्यक्ष आणि नाटक यात ख-या-खोट्याइतकं अंतर असतं. आणि ते अंतर तसंच राहतं.

अनेक वर्षं ’तो मी नव्हेच’ चे प्रयोग मी केले. कोर्टाच्या वातावरणाशी अती परिचयात अवज्ञा होण्याइतपत सलगी निर्माण झाली. शब्द्च्छल करुन खोट्याचं खरं भासवायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी दहा-बारा वर्षाच्या सक्तमजुरीला सामोरा गेलो, त्यासाठी मला मरावंही लागलं. पण प्रत्येकवेळी अहिरावणासारखा माझ्याच रक्ताच्या थेंबातून जिवंत ठेवून पुन्हा सरळ मार्गी माणसांच्या मानगुटीवर मी बसत असे. माझी लखोबा लोखंडेची भूमिका इतकी बेमालूम होत असे की, महाराष्ट्रातील एका मोठ्या पुढा-याने माझ्या डोक्यावरची गांधी टोपी इतकी अलगद उडवली आणि गद्दारी करून त्याच्या पक्षातून बाहेर पडलेल्या दुस-या एका पुढा-याच्या डोक्यावर चढवली. त्यामुळे महाराष्ट्रात दोन ’लखोबा’ निर्माण झाले. मला प्रत्येक प्रयोगात मरून जिवंत व्हावं लागलं. ती दुसरी टोपी मात्र अनेकांच्या डोक्याला फिट बसली. सदानकदा "तो मी नव्हेच" म्हणत आपली गुन्हेगारी आणि पुढारीपण सांभाळत अनेक ’लखोबा’ निर्माण झाले. त्यांच्या भ्रष्ट्राचारी विश्वदर्शनामुळं माझा लखोबा बापुडवाणा ठरला. पण मराठी वाङमयात ’तो मी नव्हेच’ असा वाक्प्रचार रूढ झाला.

एकदा नगरला एका खटल्यात मला साक्ष द्यायची होती. नगरला जायचंच, म्हणून आदल्या दिवशी रात्री नगरमध्ये मी ’तो मी नव्हेच’चा प्रयोग केला. ज्यांच्यासमोर माझी केस उभी राहणार होती, त्या न्यायमूर्ती श्रीमती पाटील या प्रयोगाला उपस्थित होत्या. माझी कोर्टातली सर्वांची खिल्ली उडवणं बघून त्या खूप हसल्याही होत्या. पण मनातून रुष्ट झाल्या असाव्यात. दुसरे दिवशी कोर्टात माझं नाव पुकारल्यावर मी साक्षीदाराच्या पिंज-यात जाऊन उभा राहीलो. नाटकातल्या सवयीमुळं मी पिंज-यावर रेलून उभा राहिलो. जज्जबाई ताबडतोब हातोड्यासह कडाडल्या, "हे कोर्ट आहे, नाटक नाही. नीट उभे रहा." आणि नंतरच्या अर्ध्या-पाऊण तासात त्यांनी माझी अक्षरशः चाळणी केली. माझ्या मिश्किल उत्तरांना त्यांनी कोर्टाची अशी जरब बसवली की, ’पुन्हा कोर्टाची पायरी चढणार नाही’ अशी भीष्मप्रतिज्ञा करूनच तिथुन बाहेर पडलो.

’मला काही सांगायचंय’मध्ये मी स्वतःच निवृत्त जज्ज होतो. औरंगजेबच्या भूमिकेत न्यायदान माझ्याच अखत्यारित होतं. ’अश्रुंची झाली फुले’मधील जेल दृश्यामुळं कैद्याची मानसिकता मला कळली होती आणि 'थॅंक्यू मिस्टर ग्लाड’ मधील जेल सुपरिटेण्डन्ट ग्लाडसाहेबामुळं मला तुरूंगातील क्रूर कठोर हडेलहप्पी समजून घेता आली.

पण हे सगळं नाटकात, प्रत्यक्षात मी मुंबईतल्या तुरूंगामध्ये दोन-चार रात्री काढल्या आहेत, हे कुणाला खरं वाटेल? पण ते खरं आहे. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झालं, माझ्या होणा-या सासूबाईंच्या-इंदिराबाई कुलकर्णी यांच्या समाजवादी पक्षामुळे मीही त्यात ओढला गेलो. कॉ.डांगे, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर, कॉ.रेड्डी, शाहिर अमर शेख आदींच्या सहवासात आलो. आचार्य अत्र्यांचा तोफखाना सतत कुठे न कुठे धडधडत असे. तेथील वक्त्यांना गरज पडल्यास पाणी पाजायचं काम माझ्याकडे होतं. अर्थात मोर्चे, घोषणा, पत्रकबाजी हे सगळं आलंच. नुकतच माझं ’भटाला दिली...’ नाटक रंगमंचावर आलं होतं. चांगलं चाललं होतं. पण प्रयोगाव्यतिरिक्त मिळणारा वेळ मी या राजकीय ’ओसरी’वर धुमाकूळ घालत होतो.

एकदा सचिवालयावर मोठा मोर्चा निघणार होता. कापाच्या मैदानावर म्हणजेच आझाद मैदानावर सर्वांनी जमायचं होतं. एक बोरीबंदराकडून व दुसरा फ्लोराफाऊंटन्टकडून सचिवायलयावर मोर्चा काढणार होते. मुख्यमंत्री मोरारजीभाईंची दंडुकेशाही असल्याकारणानं सर्वच कडेकोट बंदोबस्त होता. आमचा मोर्चा क्झेवियर्स कॉलेज, ऎक्सप्लनेड कोर्ट यांच्याजवळ येताच पोलिसांनी दंडुके उभारून आमच्यावर चाल केली. वेगवेगळ्या घोषणा बेंबीच्या देठापासून ओरडण्यात मी पटाईत. पोलीसांचा हल्ला आल्यानंतर, पळापळ सुरू झाली. त्यात कोणाचा तरी पाय लागून मी रस्त्यात आडवा झालो. तेवढ्यात तिथले प्रमुख इन्स्पेक्टर बलसारा आणि दोन हवालदार माझ्या जवळ आले आणि माझ्या हातापायांची झोळी करून, त्यांनी ती जवळच असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये टाकली. हां हां म्हणता व्हॅन भरली आणि निदर्शकांच्या दगडधोंड्याना न जुमानता आम्हाला भायखळा जेलकडे घेऊन गेली. भायखळ्याचा जेल म्हणजे कोंदट,कुबट. एका मोठ्या सेलमध्ये आम्हा सर्वांना ढकलण्यात आलं. या सगळ्या गडबडीत एक मात्रं झालं. दुस-या दिवशी पोलीसांनी मला उचललेल्या अवस्थेतला फोटो त्या दिवशीच्या ’फ्री प्रेस जर्नलच्या पहिल्या पानावर छापून आला. रात्रभर घरी परत न आल्यामुळं घरी-दारी माझी चौकशी सुरू झाली. रात्रभर ढेकणांच्या सहवासात जागरण झाल्यानंतर आम्हा सर्वांची रवानगी वरळी समुद्रकिना-याजवळील बरॅक्समध्ये झाली- जिथं सध्या आमदारांची गृहसंकुल उभी आहेत. सकाळी प्रातर्विधी उरकल्यानंतर आम्हाला ऍल्युमिनियमच्या टमरेलमधून गरमगरम सोजी प्यायला देण्यात आली. हळूहळू एसेम जोशी, ना.ग.गोरे, आचार्य अत्रे,सेनापती बापट,प्रबोधनकार ठाकरे वगैरे मंडळी भेटून गेली. कोणत्याही परिस्थितीत माफी मगायची नाही, शिक्षा भोगायची असा आमचा निर्धार होता पण हाय, येणा-या रविवारी माझा ’भटाला दिली ओसरी’चा प्रयोग किंग्ज जॉर्जमध्ये जाहीर झाला. तो प्रयोग रद्द होऊ नये म्हणून माझे सासरे ’महाराष्ट्र ग्रंथ भांडार’चे शंकरराव कुलकर्णी यांनी जामिनाची तरतूद केली. किल्ला कोर्टात मला जामीन मिळाला. आमचा प्रयोग झाला. नंतर सर्व निदर्शकांना माफीही मिळाली.

हा प्रसंग आणि फ्री प्रेसमधला तो फोटो मी जपून ठेवला असता तर नंतर आलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णकलशातले काही थेंब माझ्या अंगावर पडले असते. मला ताम्रपटही मिळाला असता. सरकार दरबारी थोडी लाचार धडपड केली असती तर एखाद्या विदेशी मद्याच्या दुकानाचं लायसन्सही पदरात पडलं असतं. आम्हाला पेट्रोलपंप नकोच होता, शैक्षणिक संस्थाही उभारायची नव्हती. साखर, दूध, सूत यांची संस्थाही काढायची नव्हती. तेवढं दारूचं दुकान मिळालं असतं तर मॉगॅंबो खूष झाला असता. चार पिढ्यांची ददात संपली असती. परंतु ’तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ आणि तेच नव्हतं ना!असो!

लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी

मायबाप रसिकहो,

खरतरं नटसम्राट बालगंधर्व आपल्याला मायबाप म्हणत आणि आपण मायबाप आहात असंच आपल्याशी वागत. आपले लाड त्यांनी जेवढे पुरवले तेवढे अन्य कोणत्याही रंगकर्मीनं पुरवले नसतील. तत्कालीन नाट्यगृहामध्ये येणा-या प्रेक्षकांसाठी उच्च प्रतीचा महागडा उद आणि लोबाण वापरून सबंध वातावरण त्यांनी प्रसन्न केलं. आनंदराव आणि बावूराव पेंटरसारख्या विख्यात चित्रकारांकडून पडदे रंगवून घेऊन आपणासमोर श्रीमंतीची आरास मांडली. रंगमंचावरील हिरव्या चादरीवर, बादशाही इराणी गालिचे पसरून श्रीमंतीची आरास अधिक खुलवली. नाटकातील पात्रांच्या अंगावर झुळझुळीत आणि वस्त्र वापरून रजवाड्यांच्या शौक कसा असतो, याचं दर्शन घडवलं. मुकुटावर आणि आभूषणांवर ख-या सोन्याचा मुलामा चढवला. वर कळस म्हणून देवदुर्लभ गायनानं , ज्याने आपले कान तृप्त केले, त्यांचं स्मरण करून आम्ही रंगमंचावर वावरलो. आम्हीही आपल्याला मायबापच म्हणतो, पण आई वडिलांचं कोडकौतुक करण्याऎवजी आम्ही आपल्याकडून लाड करून घेतले . नटहट्ट पुरे करून घेतले. क्वचित तुमचा उपमर्दही केला. त्या सर्वांची स्मरणकहाणी म्हणजे हे माझे आठवणीतले मोती.

दर आठवड्याला मी माझ्या स्मृति-सागरात बुडी मारून, आपणासाठी एक मोती घेऊन येणार आहे. हा मोती बोरा एवढा टपोरा असेल, जोंधळ्याएवढा बारीकही असेल, गरगरीत गोल असेल, तर ओबड-धोबडही असेल. मोतियाच्या रंगाचा तेजस्वी असेल किंवा कळा गमवलेला तेजहीन असेल. पण असेल तो अस्सल मोतीच.

आयुष्याची उणी-पुरी साठ पासष्ट वर्ष मी रंगभुमीवरच वावरलो. अगदी प्रमुख भूमिकेपासून तो रंगमंचामागील कामगारापर्यंत सर्व भूमिका वठवल्या. क्वचित ठेचकाळलो, पडलो, रक्तबंबाळही झालो. पण, पुन्हा उठून चालू लागलो आणि रसिका, हे सारं आपल्या डोळ्यासमोरच घडलं, या सर्व प्रदीर्घ वाटचालीत अनेक मोठ्या माणसांचं बोट धरून मी चाललो. अनेक लहानांना बोटाला धरून चालविलं. ही सर्व लहान-थोर माणसं या लेखमालेच्या निमित्तानं मला खुणावताहेत, मला स्पर्श कर म्हणाताहेत. अनेक ब-या-वाईट घटना माझ्या भोवती फेर धरून नाचताहेत. या सगळ्याचं शब्दांकन करण्याचा माझा हा प्रामणिक प्रयत्न, गोड मानून घे एवढीच रसिका, तुझ्या चरणी प्रार्थना.

कोणाबद्दल कडू-वाईट मी लिहिणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. या सर्व गोष्टींच्या पल्याड मी गेलो आहे. आता ’पैल तीरी काऊ कोकताहे’ अशी माझी अवस्था आहे. पण तरीही मी माणूस आहे, स्खलनशील आहे. माझ्याकडून, प्रसंगी काही कोणाबद्दल कडू-गोड लिहिलं गेलं तर आपण मला क्षमा करालच. पण त्यांनीही मला क्षमा करावी अशी विनंती. एक मात्र नक्की, की आपल्या रंजनासाठी आम्ही ’लटके ना बोलू, सांगू वर्तमान खोटे’. जे असेल ते खरं असेल, तो योगायोग किंवा काल्पनिक आहे असं कोणी समजू नये!

आता पुढच्या आठवड्यात मी माझ्या आठवणीतील पहिला मोती आपणास अर्पण करण्यासाठी येणार आहे. असाच मी वर्षभर येणार आहे. आपणास ह्या मोत्याचा चारा भरवण्याचं श्रेय अर्थातच चाफ़ा.कॉमकडे आहे. मोत्याची झळाळी आणि चाफ़ाचा सुगंध लेवून आता ही मालिका अखंडित चालू रहावी अशी आपण माझ्यावतीनं त्या नियन्त्याकडे प्रार्थना कराल ना? करालच या विश्वासातला

आपला,
प्रभाकर पणशीकर

लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी